संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या धान खरेदी- विक्री प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार ; तोडसा परिसरातील जागरूक जनतेची मागणी..
एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यातील मौजा तोडसा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, तोडसा’ येथील सचिव श्री. नानेश गावडे यांच्या भ्रष्टाचाराची व मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तोडसा परिसरातील सुज्ञ व जागरूक नागरिकांनी केली आहे.
‘तोडसा’ इलाका पट्ट्यातील जागरूक नागरिक या नात्याने खालीलप्रमाणे तक्रार सादर करत आहेत..
“धान खरेदी – विक्रीमध्ये अनियमितता आणि परस्पर व्यवहार”__
तोडसा सहकारी संस्थेचे सचिव श्री. नानेश गावडे यांनी संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या धान खरेदी-विक्री प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याची दाट शक्यता आहे. स्थानिक स्तरावर अशी चर्चा आहे की, त्यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून धानाची परस्पर विक्री केली असून, त्यातून मिळालेला पैसा वैयक्तिक फायद्यासाठी वापरला आहे. या प्रकरणाची लेखापरीक्षण (Audit) आणि प्रत्यक्ष साठ्याची तपासणी केल्यास मोठे घबाड उघडकीस येऊ शकते.
“उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता”_
सचिवांचे अधिकृत वेतन आणि त्यांचे राहणीमान यात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यांनी अल्पावधीतच कोटी रुपयांच्या घरात गुंतवणूक करून आलिशान बंगला बांधला आहे. एका सहकारी संस्थेच्या सचिवाला इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता गोळा करणे निव्वळ मानधनावर शक्य नाही. या मालमत्तेच्या निधीचा स्रोत काय, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
“अवैध सागवान लाकडाचा वापर”__
सदर बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना (चोरीच्या) सागवान लाकडाचा वापर करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. हा प्रकार केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून वनसंपदेची लूट देखील आहे.
“तोडसा परिसरातील नागरिकांची मागणी”__
विशेष चौकशी समिती गठीत करण्यात यावी — तोडसा सहकारी संस्थेच्या गेल्या ३ वर्षांच्या धान खरेदी-विक्री व्यवहारांची विशेष समितीमार्फत चौकशी व्हावी.
मालमत्तेची तपासणी करण्यात यावी– श्री. नानेश गावडे यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) किंवा संबंधित विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.
“फौजदारी कारवाई करावी”__ तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा अशा प्रकारे हडप केला जात असेल, तर तो गंभीर गुन्हा आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा नाहीतर शेवटी असं व्हायला नको की, चोर -चोर मावस भाऊ होतील आणि प्रकरण दाबल्या जाईल. अशी भावना परिसरातील नागरिकांनी बोलून दाखवत आहेत.




